अस्वस्थतेतून बाहेर निघण्यासाठी वारकरी समुदायाचे विचार महत्त्वाचे : शरद पवार

Santosh Gaikwad October 01, 2023 04:47 PM


पुणे -दि.१ ऑक्टोंबर : कोणत्याही समाजातील कुठलाही धर्म चुकीच्या प्रकाराला आणि वृत्तीला समर्थन करत नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करताना केले. 

यावेळी  खासदार अमोल कोल्हे , श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज, विकास गावंडे, हरिभक्त परायण श्याम सुंदर महाराज तसेच संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.


शरद पवार म्हणाले की, भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश देतेप. आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो.


शरद पवार   म्हणाले की, हा देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे. तो विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाणे मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणं, ते शक्तिशाली करणे आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो.

आज सबंध देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असते. मी एकच गोष्ट सांगतो आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे. समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे, देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. ती विचारधारा जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे, असेही शरद पवार म्हणाले.