“शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

Santosh Sakpal May 06, 2023 02:35 PM

बारसू मध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल


बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. बारसू या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. तिथल्या कातळ शिल्पांची पाहणीही त्यांनी केली. तसंच पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.

आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले? आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा. गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचं? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मला या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकार एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. हे सरकार पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. जर माझी सगळ्या गोष्टींची नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला असता का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. इतकंच नाही तर जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसले होते? असाही संतप्त प्रश्न त्यांनी विचारला आहे.

प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य हा परिसर आहे. त्या परिसराचा, निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे. चांगल्या गोष्टी आपण जरुर केल्या. चिपी एअरपोर्टही माझ्या कालखंडात आला. इथल्या मोठ्या आणि सूक्ष्म माणसांना तो आणता आला नाही. जर एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? ते मला मुळीच मान्य नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.