देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक : उध्दव ठाकरेंची कडाडून टीका

Santosh Gaikwad July 10, 2023 07:54 PM

नागपूर :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नागपूरमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला. फडणवीसांची हालत सध्या अशी विचित्र झालेली आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असा उल्लेख करताना ठाकरेंनी फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. यावर "अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा" अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर कडाडून टीका केली.  

 

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे म्हणाले, "कालपरवा पर्यंत आपल्यासोबत जे होते ते आता पलिकडं गेले आहेत. त्यांना अचानक साक्षात्कार झाला. जो काही विकास घडतोय तो त्यांच्याचमुळं घडतोय. कालपर्यंत एकमेकांना शिव्या देत होते, आता अचानक विकास पुरुष झालेत. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय. अंबादास दानवेंनी मला सांगितंल की, नागपुरमध्ये गावठी कट्टा गहाण टाकून पैसे दिले जातात. माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याला आपलं जमीन, घर आणि पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं. पण इथं गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद इथं नागपूरमध्ये गृहमंत्र्यांच्या गावात आहे अशा शब्दात   


२०१४ साली युती शिवसेनेनं नव्हती तोडली. यावेळी असं काय घडलं होतं की तुम्ही आमच्याशी युती तोडली? असा सवालही त्यांनी विचारला. त्यावेळी एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि सांगितलं गेलं की तुमच्यासोबत जायला नको असं भाजपचे लोक म्हणत आहेत. म्हणजेच युती तुम्ही तोडली, वार करणारे आम्ही नाही तुम्ही आहात असेही ठाकरे म्हणाले.