भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल : उध्दव ठाकरेंचा टोला

Santosh Gaikwad January 23, 2024 06:42 PM


नाशिक : राम एका पक्षाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल," असा टोला ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत ती त्रिवार मान्य नाही अशा शब्दात खडसावले. 

 नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.  

ठाकरे म्हणाले की, "न्यायाविरूद्ध लढण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रात ठिणगी पेटवली त्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यांना मी अभिवादन करतो. अनेकांनी रामाचे मुखवटे घातले आहेत. पण तुम्ही माझी तुलना रामाशी केली नाही त्यासाठी धन्यवाद. जो महाराष्ट्रावर चालून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली असेही ते म्हणाले. 

 राम की बात हो गयी अब काम की बात करो. 75 वर्षात काँग्रेसने काय केलं विचारता, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा? हिंमत असेल तर मैदानात या, शिवसैनिक हे माझी वडिलोपार्जित आहे. चोरून मिळवले नाहीत. भाजपमुळे दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली.." असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.