महाराष्ट्रातील निकालानंतर दोन पक्ष लोप पावतील : पृथ्वीराज चव्हाण यांच मोठं विधान

Santosh Gaikwad May 06, 2024 10:33 AM


मुंबई :  महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं असून ७ मे, १३ मे आणि २० मे या तीन दिवशी अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. ४ जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र, त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असं मोठं विधान काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. हे दोन पक्ष नेमके कोणते? याबाबत त्यांनी भाष्य केलं नसलं, तरी त्यावरून अंदाज बांधले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. या प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती असा सामना रंगल्याचे दिसून आले.   “महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन दोन्ही बाजूला. या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसं दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठे जातील ते आत्ता मी सांगत नाही. पण दोन पक्ष दिसणार नाहीत”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.


चव्हाण म्हणाले की,  “सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल मविआच्या बाजूने लागेल. जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात यापेक्षा मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे. मोदींची तारांबळ झाली आहे. धावपळ होत आहे. जर तुम्ही ४०० पारचा नारा दिला आहे, तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात?” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.