नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षभरात खुले होणार ! मुख्यमंत्र्यांनी केली हेलिकॉप्टरमधून पाहणी

Santosh Gaikwad June 07, 2023 04:16 PM

 

 नवी मुंबई  : ‘ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली.  राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने हे महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करुन नियोजित वेळेत विमानतळ वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 


 “नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते, उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत” असेही  मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.  


  उलवे येथील विमानतळाच्या आज हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल. 2024 पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट जनतेला देणार आहे, असे त्यांनी सांगितले.


विमानतळाविषयी -:

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२  किलोमीटरचा सी लिंक महत्वाचा दुवा ठरेल.  दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल.  म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२  विमाने उभी राहतील. ५५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.