तलाठी परिक्षेच्या पेपर फुटीचां छडा लावून कठोर शिक्षा करा :- नाना पटोले

Santosh Gaikwad August 18, 2023 06:31 PM


मुंबई, दि. १८ ऑगस्ट : नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी भाजपाप्रणित राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही अशी एकही परिक्षा होत नाही. गुरुवारी तलाठी पदाच्या परिक्षेचा पेपर फुटला आणि लाखो तरुणांची निराशा केली. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे पण राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. तलाठी परिक्षेच्या पेपर फुटीमागे जे लोक असतील त्या सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा जेणेकरून भविष्यात कोणीही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाही, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील तीन पक्षांचे येडे सरकार विद्यार्थ्यांची क्रूर खट्टा करत आहे. खाजगी कंपनीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जातात. ४४६६ तलाठी पदासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज भरले आणि यातून १ अब्ज ४ कोटी १७ लाख रुपयांचे परीक्षा शुल्क घेतले पण विद्यार्थ्यांन पसंतीचे परीक्षा केंद्रही दिले नाही. परिक्षेसाठी स्वतःच्या जिल्ह्यातून दूरचे परीक्षा केंद्र दिले गेले. त्यामुळे हजारो विद्यार्थी या परिक्षांना मुकले आहेत. एवढे करुनही या परिक्षेचा पेपर फुटला हे अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचा प्रकार आहे. 


राज्यात यापूर्वी झालेल्या परिक्षांचे पेपर फुटल्याचा प्रश्न विधानसभेत पुराव्यासह उपस्थित केला असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपर फुटीच्या खोट्या बातम्या आहेत, अशा बातम्या देणाऱ्या प्रसार माध्यमांवरच हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. या सरकारला नोकर भरती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येत नाही, दोषींना शिक्षा करण्याची मानसिकताही या सरकारमध्ये नाही. उलट पेपर फुटीतच्या बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला जातो हे अत्यंत आक्षेपार्ह व निर्ढावलेल्या मनोवृत्तीचा प्रकार आहे. गृहमंत्री फडणवीसांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे नाही. नोकर भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ तिघाडी सरकारने थांबवावा अन्यथा विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले तर सरकारला ते महागात पडेल असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. 


*काँग्रेस पक्ष MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी..*

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षांसदर्भात विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत. राज्यसेवाच्या धर्तीवर एकच कट ऑफ लावणे. एमपीएससी मधील राज्यसेवा व संयुक्त परिक्षेच्या मुख्य परिक्षा ऑफलाईन घेणे, आयोगाची कर सहाय्यक व लिपीक पदासाठी असणारी स्किल टेस्ट ही GCC-TBC टायपिंग सर्टिफिकेट प्रमाणे शब्द मर्यादा पाळून घ्यावी, जेणेकरुन जागा रिक्त राहणार नाहीत. सरळसेवेसाठी आकारण्यात येणारे एक हजार रुपये शुल्क कमी करणे तसेच उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर पेपरफुटीविरोधात कायदा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व मागण्या रास्त असून त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, असे पटोलेही सांगितले.