सरकारचं डेथ वॉरंट निघालं, १५-२० दिवसात सरकार कोसळणार : ..संजय राऊत यांचे भाकीत

Santosh Gaikwad April 23, 2023 01:35 PM

मुंबई: आज जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र या सभेआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसांत शिदे, फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. फक्त आता आधी सही कोणी करायची हेच बाकी असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले.गेले कित्येक महिने उलटून गेल्यानंतर आजही विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत भाकित केलं आहे.  सध्याचे जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे ४० आमदार आहेत त्यांचं जे राज्य सुरूये ते येत्या १५ ते २० दिवसांत कोसळणार आहे, असा दावाही केला आहे.