मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
सात रेल्वे स्टेशन आजूबाजूला असलेली *धारावी म्हणजे मुंबईचे काळीज* असून या धारावीतून एक लाख झोपड्या, घरे,दुकाने,गाळे यांना अपात्र ठरवून येथे दुसरे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) उभारण्याचा अदानीच्या कंपनीचे षडयंत्र आहे असा घणाघाती आरोप धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी केला.
धारावी मधील शिवराज मैदानावर धारावी बचाव आंदोलन या संघटनेची विशाल जनसभा काल सायंकाळी झाली.त्यावेळी बाबुराव माने बोलत होते.
धारावी ५४० एकर जमिनीवर पसरलेली आहे. आणि या क्षेत्रावर आज १ लाख १० हजार झोपड्या घरे,दुकाने,गाळे आहेत.या झोपडी,घरे,दुकाने गाळ्यांना ५०० चौरस फूट इतकी जागा दिली तरी संपूर्ण धारावीवासियांचे पुनर्वसन या मुंबईच्या काळजावरच होऊ शकतो असे धारावी बचाव आंदोलनाच्या आमच्या नामांकित इंजिनियरने अभ्यास करून छाती ठोकपणे सांगितलेले आहे,असे बाबुराव माने यांनी धारावीकरांच्या लक्षात आणून दिले.या धारावी नामक काळजावर सगळ्या धारावीचे पुनर्वसन होऊ शकत नाही. हे अदानीने आमच्या इंजिनियर समोर बसून सांगावे, उगीच हवेतील बाता बंद करा,असेही बाबुराव माने यांनी ठणकावून सांगितले.
वरळीत १४०\१५० चौरस फुटांची घरे असलेल्यांना राज्य सरकार ५०० चौरस फुटापेक्षा जास्त आकाराची घरे देणार आहेत. मग इथे तर १५०/२००\३०० चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या झोपड्या,घरे,गाळे असूनही राज्य सरकार,अदानी कंपनी आम्हाला ५०० चौरस फुटांची घरे का देत नाही असा सवाल बाबुराव माने यांनी केला.
मलबार हिल,मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले हे हजारो चौरस फुटाचे आहेत. येथे ५०० चौरस फुटाचे घर द्यायला राज्य सरकार का कंजूसपणा करते असा सवालही बाबुराव माने यांनी यावेळेस केला.धारावीतील कुंभारवाड्यातील रहिवाशींची घरेही त्यांच्या व्यवसायामुळे सध्या मोठ्या आकाराची आहेत. हे कुंभार बांधव तुमच्या ३५० चौरस फुटाच्या जागेत कशी काय मटके, गाडगे, मडकी, रांजणांचे निर्मिती करणार हे अदानी साहेब आणि राज्य सरकारने स्पष्ट करावे, असे आव्हानही बाबुराव माने यांनी दिले.
१ लाख झोपडीधारकांना अपात्र ठरवण्याचे षडयंत्र हे पक्के झालेले आहे.म्हणूनच देवनार,गोवंडी,मुलुंड, कुर्ला मदर डेरी येथील जागा या अदानीच्या घशात घातल्या जात आहे असा आरोपही माने यांनी यावेळी केला
धारावीत लाख, सव्वा लाख झोपडपट्टीवासीय आहेत. धारावीत लाख, सव्वा लाख झोपड्या, घरे आहेत. तुम्ही जर धारावीतून एक लाख लोकांना हुसकावून मुलुंड , देवनार, कुर्ला,मदर्स डेरी येथे हलवत हलवत असाल तर तुम्ही नेमके पुनर्वसन कोणाचे करीत आहात. तुम्हाला येथे दुसरे बांद्रा कॉम्प्लेक्स-बीकेसी उभी करायची आहे हे लपून राहिलेले नाही असे माने यांनी या सभेत उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात आणून दिले.
या विशाल सभेला काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख सुरेश सावंत,जोसेफ कोळी,शाखाप्रमुख सतिश कटके,आनंद भोसले,किरण काळे,मनीकडंन,भास्कर पिल्ले,महिला आघाडीच्या कविता जाधव, माया जाधव, देवयानी कोळी,मंजू वीर, युवा सेनेचे सनी शिंदे,रोहित शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उल्लेश गजा कोटा,सपाचे राहूल गायकवाड, बसपचे शामलाल जैस्वार,आपचे राफेल पाॅल, कोरडे शाम्या आदींसह काँग्रेस, शेकाप,माकप.भाकपचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योती गायकवाड म्हणाल्या अदानीचा बुलडोझर, जेसीबी धारावीतील झोपड्या पाडण्यासाठी आला तर त्यावेळी या बुलडोझरला रोखणारी पहिली मी असेल असे काँग्रेस च्या आमदार ज्योती गायकवाड म्हणाल्या.त्या ही सभा संपल्यानंतर आल्या.मात्र त्यांनी आपण येथील झोपडपट्टीवासियांच्या पाठिशी आहोत असे आश्वासन दिले.