राज्यात मृत्युचं तांडव, सरकार राजकारणात गुतंलेत ! संजय राऊत यांचे जहरी टीका

Santosh Gaikwad October 04, 2023 07:02 PM


मुंबई : महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरू असताना, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री राजकारणात गुंतले आहेत. राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा यामुळे कोलमडून पडली आहे. रुग्णालयात मृत्यू होत असले तरी सरकारला कशाचीही चिंता नाही. नांदेड आणि नागपूरमधील रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोश पाहून महाराष्ट्राच्या वाट्याला अतिशय निर्घृण, निर्दयी आणि खुनी सरकार आल्याची जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, नागपूर मधील शासकीय रुग्णालयात निष्पाप रुग्णांचा जीव गेला. ठाण्यातील कळवा शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडून ३६  जण दगावले होते. शिंदे सरकारच्या काळात रुग्णालयात रुग्ण मृत्यू प्रमाण वाढल्याचा आरोप करत, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यातील मृत्यूच्या  तांडववरून घणाघाती टीका केली.


रश्मी शुक्ला यांच्या पोलीस महासंचालक पदावरून राऊतांनी भाजपला लक्ष्य केले. शुक्ला यांच्यावर कथित फोन टॅपिंग प्रकरणाचा आरोप करण्यात आला होता. शिंदे सरकार सत्तेवर येताच, त्यांना क्लिनचीट देण्यात आल्याचे राऊत म्हणाले. देशभरात आरएसएस आणि संघ परिवार आपल्या माणसांना सर्वोच्च न्यायालयापासून पोलीस आर्मी पर्यंत कोणत्या पदावर बसवेल सांगता येत नाही, असे सांगत 


पत्रकारांवरील आरोप हास्यास्पद 

दिल्लीत केंद्रीय तपास यंत्रणांनी चीन कडून फंडिंग घेतल्याच्या आरोपाखाली काही पत्रकारांना अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. राऊतांनी त्यावर भाष्य केले. आठ नऊ पत्रकारांवर चीनकडून फंडिंग मिळाल्याचा आरोप हस्यास्पद आहे. बेडरपणे हे पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच देशाच्या सीमेवर चीन हस्तक्षेप केल्यानंतरही तोंडातून ब्र न काढणारे, पत्रकारांच्या घरावर धाडी टाकत आहे. आणीबाणीच्या काळात सुध्दा अशा कारवाया होत नसल्याचे राऊत म्हणाले. ईडीचे अधिकारी अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात, घरी घुसतात आणि अटक करतात, असे सांगत येत्या 2024 ला सर्वांचा हिशोब होणार असल्याचा सूचक इशारा राऊतांनी दिला.