मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण असताना मराठी भाषिकांचे कैवारी म्हणवणारे ढोंगी राजकारणी कुटुंबासह परदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठावर केला. उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत कोणतीही संवेदना व्यक्त केली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी पाठ फिरवली, अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले. मात्र मराठींचे कैवारी म्हणणारे ढोंगी राजकारणी मात्र युरोपात कौटुंबिक सहलीसाठी गेले आहेत, अशी खोचक टीका निरुपम यांनी उबाठावर केली. त्यांची आवड वाइल्डलाईफ फोटोग्राफी, टुरिझम असून ते परदेशी खाद्यपदार्थ खाण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पर्यटकांबद्दल संवेदना व्यक्त करण्यात वेळ मिळाला नाही, याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना यावेळी निरुपम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे जवळपास २००० पर्यटक थांबलेले आहेत. महायुती सरकारकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. शिवसेनेकडून स्टार एअरलाईन्स आणि अकासा एअरलाईन्सकडून प्रत्येकी दोन फेऱ्या झाल्या. यातून ५२० पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यात आले, अशी माहिती निरुपम यांनी दिली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्यावरवर काहीजणांनी आक्षेप घेतला. त्यावर निरुपम म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले होते. शिंदे स्वत: तिथे लक्ष घालून पर्यटकांची परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली, मात्र शिंदे यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांची नीच वृत्ती दिसून आली, असे निरुपम म्हणाले.
केंद्र सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबध तोडून टाकण्याचे मोठे निर्णय घेतले. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. मात्र यावर न थांबता केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करावी, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला हवेत, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या स्थानिकांविरोधात सरकारने कारवाई करायला हवी, असे निरुपम म्हणाले.