महाराष्ट्राचे पहिले उद्योगरत्न रतन टाटा : मुख्यमंत्र्यांकडून टाटांना पुरस्कार प्रदान !

Santosh Gaikwad August 19, 2023 03:20 PM


मुंबई ; महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' दिला जात आहे. या पुस्काराचे पहिले मानकरी पद्मविभूषण रतन टाटा ठरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने त्यांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला.


रतन टाटा यांचे शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह तसेच २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

यासमयी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा उपस्थित होते.

उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग पुरस्कार  देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या पुस्कारसोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये अन्य कही उद्योजकांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


टाटा म्हणजेच विश्वास, त्यांच्या सन्मानाने पुरस्काराची उंची वाढली :  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह, जगभरात उद्योगक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास, हे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.