कर्नाटक निकालावरून राज ठाकरेंची भाजपवर टीका म्हणाले..

Santosh Gaikwad May 14, 2023 02:14 PM


ठाणे : कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही, असं मानणाऱ्यांचा हा पराभव आहे. लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या दोन दिवसापासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांना कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयाविषयी प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला.


सुधीर मुनगंटीवार यांनीही टोला ...

दरम्यान  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात आला होता असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. पहाटेचा शपथविधी ही तुमची चूक होती, ती चूक झाली आहे. उगाच कोणाला धडा शिकवायला जाऊ नका, आता सारवासारव करण्यात काही अर्थ नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.