मोदींनी उद्योगपतींचे १६ लाख कोटी रूपये माफ केले : शेतक-यांनी विरोध केला पाहिजे ! राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Santosh Gaikwad March 14, 2024 06:29 PM



नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  २०- २५ उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले.  गेल्या दहा वर्षांत तुमचे किती कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केले ?  १६ लाख कोटी म्हणजे किती त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का, असा सवाल  राहुल गांधी म्हणाले, २४   वर्षांतील मनरेगासाठी जेवढा खर्च होईल तेवढे पैसे मोदींनी फक्त  उद्योगपतींचे माफ केले आहे.  जर उद्योगपतींचे १६ लाख कोटी माफ होत असतील तर गोरगरीब शेतकऱ्यांचेही कर्ज माफ  होऊ शकते.   उद्योगपतींच्या कर्जमाफीला शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे असे आवाहन राहुल गांधी यांनी नाशिकमधील शेतकरी मेळाव्यात मोदींवर निशाणा साधला. 


काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नाशिकमधील शेतकरी मेळाव्यात राहुल गांधी यांनी रामराम मंडळी म्हणत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.


राहुल गांधी म्हणाले, नाशिकच्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मुद्दा हा कांद्याचा आहे. याला राष्ट्रीय मीडियामध्ये कुठेही स्थान मिळत नाही. तुम्ही याची चर्चा पाहिली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला विचारला. तेव्हा नाही असा प्रतिसाद त्यांना मिळाला. राहुल गांधी म्हणाले की, मी देशभरात लाखो किलोमीटर चालत आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना भाव नाही, महागाई हे मुद्दे आहेत. मात्र त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय मीडिया बोलत नाही. ते चोविस तास फक्त नरेंद्र मोदींना दाखवतील, बॉलिवूड दाखवतील. मोदी समुद्रात तळाशी गेले तिथे मीडियाचे कॅमेरे त्यांच्यासोबत जातात. त्यानंतर ते सी-प्लेनमध्ये बसतील ते तुम्हाला दाखवले जाते.


शेतकऱ्यांच्या फायद्याचे धोरण काँग्रेस आणणार

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, असे का? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकारला जेवढी जीएसटी शेतकरी देतात तेवढीच जीएसटी अदानी देतात. शर्ट खरेदीचे उदाहरण देत राहुल गांधींनी उद्योगपती आणि सामान्य शेतकरी, सामान्य व्यक्ती सरकारला समसमान जीएसटी देत आहेत, मात्र सरकारकडून कर्जमाफी फक्त उद्योगपतींना मिळत आहे. सरकारची कमाई ही जीएसटीमधून होते. सर्वाधिक जीएसटी शेतकरी, समान्य दुकानदार, बेरोजगार तरुण, नोकरदार वर्ग देतो. मात्र शेतकऱ्यांना काहीच का मिळत नाही, असा सवाल केला.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी आणि उद्योगपती समसमान जीएसटी देत असतील तर उद्योगपतींप्रमाणेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. जर शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नसेल तर त्यांनी सरकारला सवाल केला पाहिजे की, अब्जाधिशांचे कर्ज माफ होणार असेल तर आमचेही झाले पाहिजे. उद्योगपतींचे २४ वर्षांचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही  २४ वर्षांचे कर्ज माफ झालेच पाहिजे, असे ठामपणे राहुल गांधी म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीतून बाहेर काढायचे असेल त्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतमालाला योग्य भाव दिला गेला पाहिजे. मात्र भाजप सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांना एमएसपी दिले जाणार नाही. मात्र मी सांगतो की एमएसपी दिले जाऊ शकते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आम्ही त्याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार एमएसपी देण्याचे आमचे धोरण असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.