सर्वपक्षीयांनी विधानभवनात आंदोलन करताना सभ्यता पाळा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

Santosh Gaikwad March 24, 2023 12:00 AM

मुंबई - राज्य विधिमंडळात गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेत याचे आज तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या नेत्यांनी संबंधितांवर कारवाई मागणी लावून धरल्याने काही काळ वातावरण तापले. अखेर, विधानभवन परिसरात चुकीचे वर्तन होत आहे. राहुल गांधीचे प्रकरण ही चुकीचेच, असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, पायऱ्यांवरील आंदोलन असो किंवा निदर्शने सर्वच राजकीय पक्षानी विधानभवन परिसरात सभ्यता पाळावी, असे आवाहन करत वादावर पडदा टाकला.

ललित मोदी, नीरव मोदी यांनी कोट्यवधीचा घोटाळा करत, देशाबाहेर पलायन केले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. सुरत न्यायालयाने या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. गुरुवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी निदर्शने केली. दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. कॉंग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी, आज पॉइंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत हा मुद्दा परिषदेच्या पटलावर चर्चेसाठी आणला. कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करताना म्हणाले की,  झालेला प्रकार निंदनीय आहे. पायऱ्यांवर अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात होणारे आंदोलनात पच्चास खोके, चोर, गद्दार, मिंधे आदी विशेषण विरोधकांकडून लावली जातात. मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे अवमान करणे, योग्य नाही. दोन्ही बाजूने आंदोलन करताना, सभ्यता पाळली गेली पाहिजे. चुकीच्या पध्दतीने कोणी आंदोलने करत असले तर त्यांना समज द्या. विधानभवनात चुकीचा पायंडा पडू देऊ नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले. सत्ताधारी असो किंवा विरोधक एकमेकांवर आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी केली. तसेच विरोधकांनी अपवाद वगळता, कधीही भाजपचे वरिष्ठ नेते  अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अशी वक्तव्य केलेली नाहीत, असे जगताप म्हणाले. तर सतेज पाटील यांनी, हा सगळा प्रकार लाजिरवाणा असून राहुल गांधींना जोडे मारणाऱ्या विधान परिषदेतील सदस्यांवर कारवाई करावी, ही मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कारवाई करायची असेल तर सरसकट सदस्यांवर कारवाई करावी लागेल, असे सांगितले. काँग्रेसचे सदस्य कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी खास शैलीत उत्तर दिले आहे. तसेच परिषदेत सभागृहातील सदस्यांवर कारवाई करता येत नाही, असे सांगते कॉंग्रेस सदस्यांची मागणी फेटाळून लावली. तसेच, सर्वपक्षीय सदस्यांनी लोकशाही पाळावी, अशा सूचना केल्या.