शेतकरी महिला बेरोजगारी प्रश्नांवरून विरोधकांचे सरकारवर ताशेरे !

Santosh Gaikwad August 04, 2023 08:25 PM


मुंबई - शेतकरी, महिला, तरुण बेरोजगारी आदी विषयांवर तीन आठवडे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष जनतेचा आवाज उठविण्यास यशस्वी झाला आहे. मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यास भ्रष्टाचारी सरकार हे कुचकामी ठरलं असल्याच म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. येत्या काळात विरोधी पक्ष जनतेच्या दरबारात जाऊन सरकार विरोधात त्वेषाने लढणार असल्याचा संकल्प केला असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

     

गेल्या ६ महिन्यात सरकारने केलेल्या कोणत्याही घोषणांची अंमलबजावणी कुठे झालेली नाही. सरकारच्या उद्योग विभागाने काढलेली श्वेतपत्रिका ही काळी पत्रिका ठरली आहे, अशी टीका दानवे यांनी केली. केंद्राने राज्यात होणारे सर्व प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातला नेले. बोगस  बियाणांबाबत सरकारने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कापसाला भाव न देऊन शेतकऱ्यांना हे सरकार दिलासा देऊ शकले नाही. या अधिवेशनात कोणताही मोठं प्रकल्प  हे सरकार आणण्यात अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी केली.  पुरवणी मागण्या मंजूर करून असमान निधी वाटप करून ९० मतदारसंघाना त्यांच्या विकासापासून दूर ठेवण्याच पाप या सरकारने केल्याचा आरोप दानवे यांनी केला. 

  

विविध आयुधांच्या माध्यमातून विरोधी पक्षाने या  सरकारला पूर्णपणे घेरलं मात्र सरकारने त्याला सामोरे न जाता पळ काढण्याचा प्रयत्न केला. कोणतंही समाधानकारक उत्तर सरकारकडून देण्यात आलं नाही.  सरकारने जे जे बिल आणले ते मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी  मूळ प्रश्नापासून पळ काढला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री विशेषतः उत्तर देण्यास गैरहजर राहिले. यावरून हे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचं पाप करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.