महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी खाेक्यांची मागणी : आदित्य ठाकरेंचे सरकारवर गंभीर आरोप

Santosh Gaikwad February 26, 2024 04:16 PM


मुंबई, दि. २६ः 
मुंबई, पुणे महानगर पालिकांमधील प्रशासकांच्या बदल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या बदल्यांसाठी सरकार खोक्यांची मागणी करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मागील महिन्यांपासून तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध प्रकल्पांवरून ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष्य केले.
 
पूर्ण झालेल्या उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यास सरकार जाणीवपूर्वक विलंब करत आहे. नवी मुंबई रेल्वे, गोखले उड्डाण पूल, मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प, दिघा रेल्वेस्थानक, उरण-खारकोपर लोकल मार्ग, पुणे विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीच्या रखडलेल्या लोकापर्णांचे दाखले देत, ठाकरेनी सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, गोखले पुल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. पालकमंत्र्यांना पूल खुला करण्यास वेळ नाही. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात सोशल माध्यमातून आवाज उठवल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. संध्याकाळी एका पुलाचे उद्घाटन ठेवले. स्वतःला पालकमंत्री म्हणवून घेतात, दुसरीकडे लोकाभिमूख कामे प्रलंबित ठेवतात, असे सांगत ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. पुण्यातील रुबी हॉल उद्धाटन लवकरच करावे. नवी मुंबईतील दि. बा. पाटील विमानतळाचे नामकरण तातडीने करावे, अशी मागणी केली.  


मुंबई, पुणे महानगरपालिका येथील प्रशासकांच्या बदल्या प्रलंबीत आहेत. गेल्या ४ वर्षे या आयुक्तांच्या बदल्या केलेल्या नाहीत. सरकारमधील काही मंत्री बदलीसाठी आयुक्तांकडे खोक्यांची (पैशांची) मागणी करत आहेत. ठराविक रकमेची मागणी करत, आयुक्तांना बदलीची हमी दिली जात आहे, गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. महानगर पालिकेतील सर्व प्रशासकांची बदली ताबडतोब व्हावी, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिला आहे. सरकार मात्र खोक्यांची मागणीवर अडून बसल्याने बदल्या केल्या जात नाहीत असे ठाकरे म्हणाले.
 
जनरल डायर कोण ?


मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार होते. परंतु, जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाला. अमानुष मारहाण झाली. डोकी फोडली. यामागे जनरल डायर कोण मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री 
याचा शोध लागलेला नाही, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर तोफ डागली. सध्या लोकप्रतिनिधी जातीयवादी टीका करण्यात व्यस्त आहेत. उपकाराची भाषा बोलतात. ही बाब खेदजनक आहे. कोणत्याही समाजाचा अपमान किंवा त्यांना अपशब्द वापरण्याची कोणतीही गरज नाही, असे ठाकरेंनी ठणकावले.