युतीत कोणताही वाद नाही : खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

Santosh Gaikwad June 17, 2023 05:27 PM

कल्याण :  गेल्या काही दिवसांपासून युतीत वाद सुरू झाला असे भासवले जात आहे. पण आम्ही एका विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे युतीत आमच्यात कोणताही वाद नाही. दुसरे म्हणजे जाहिरातीवरून तर मुळीच कोणताही वाद नाही, असे स्पष्टीकरण देत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जाहिरातीवरून निर्माण झालेल्या शिवसेना भाजपतील वादंगवर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. कल्याणात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी हे सांगितलं.  


कल्याण पूर्वेतील लोकग्राम पुलाचे भूमीपुजन खासदार शिंदे यांच्या हस्ते  पार पडले. या कार्यक्रमाला भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित नसल्याने राजकीय चर्चा रंगल्या होत्या. मध्यंतरी वृत्तपत्रात दिलेल्या  जाहिरातीवरून भाजप शिवसेनेत वाद उफाळला होता. भाजपनेही नाराजी दर्शविली होती. मात्र दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले होते.  त्या वादानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, विरोधकांना दुसरं काम नाही, वितुष्ट कस निर्माण करायचं, एकमेकांमध्ये लावालावी कशी लावायची.  कोणत्याही छोटया गोष्टीवरून युती तुटणार नाही. गेल्या अकरा महिन्यात सरकारच्यावतीने मोठया प्रमाणात कामे झाली आहेत असे शिंदे यांनी सांगितलं.  


केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने या पुलाच्या संपूर्ण उभारणीसाठी एकूण ७८.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील ४२.५० कोटी रूपये निधीतून या पुलाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. येत्या मार्च २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असून पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसराला आणि शहराच्या बहुतेक पूर्व भागाला रेल्वे स्थानकाशी जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागत असल्याने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.


उध्दव ठाकरेंवर टीका 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरही टीका केली. शिंदे म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरे हे घरात होते, तर एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये होते. त्यामुळे लोकांची कामे होऊ लागली. ठाकरेंना माणसं सांभाळता आली नाही. आणि आम्हाला गद्दार गद्दार म्हणून हिनवले जाते असे शिंदे म्हणाले.  महाराष्ट्राच्या संस्कृतीत असे कधीही घडले नाही, असे वर्तन काही राजकीय नेत्यांचे आहे. आमची नावे घेतल्यावर ते थुंकतात, या पेक्षा खालची पातळी त्यांची असू शकते. संस्कार नावाचा काही प्रकार आहे का, अशी टीका खासदार शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.