नितीशकुमारांनी धरली एनडीएची वाट, नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, इंडिया आघाडीला धक्का !

Santosh Gaikwad January 28, 2024 05:40 PM


बिहार :बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. नितीशकुमार यांनी   एनडीएची वाट धरीत नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाच वर्षाच्या कार्यकाळात नितीशकुमार यांनी तिस-यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.तर भाजपकडून सम्राट चौधरी आण  विजय सिन्हा दोन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.नितीशकुमार यांनी एनडीएची वाट धरल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का समजला जात आहे. 

 

नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल(राजद)आणि काँग्रेस सोबतच्या महाआघाडीला सोडचिठ्ठी देऊन ‘एनडीए’मध्ये सामील होऊ शकतात.या तर्कवितर्कांना गेल्या दोन तीन दिवसांपासून उधाण आलं होतं.अखेर रविवारी यावर शिक्कामोर्तब झाले.नितीशकुमार यांनी सकाळी ११ वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर ९व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

१७ महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. ते विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत गेले. राज्यात महागठबंधनचं सरकार आलं. पण दीड वर्षातच नितीश यांनी पलटी मारली. आता ते पुन्हा भाजपची साथ धरली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 

 नितीशकुमार म्हणाले की, आरजेडी आघाडीत चांगले काम करत नव्हती.आता पूर्वीची युती सोडून नवी युती झाली आहे.आज आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो.आम्ही काम करत होतो. ते अजिबात काम करत नव्हते.लोकांना त्रास होत होता. आम्ही बोलणे बंद केले होते.


अयोध्देत राम तर बिहारमध्ये पलटूराम : संजय राऊत यांची टीका 

 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमार आणि भाजपवर टीका केली आहे. ‘बिहारमध्ये नितीशकुमार इंडिया आघाडीपासून दूर गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. त्यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटुराम आहे. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे,’ अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.


या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 १ सम्राट चौधरी (भाजप)

२ विजय कुमार सिन्हा (भाजप)

३ डॉ. प्रेम कुमार (भाजप)

४ विजय कुमार चौधरी (जेडीयू)

५ बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)

६ श्रावण कुमार (जेडीयू)

७ संतोष कुमार सुमन (HAM)

८ सुमित कुमार सिंग (अपक्ष)