नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी, शेतकरी, जवान, महिला तरुण सर्वांना फसवले. : नाना पटोलेचा निशाणा

Santosh Gaikwad February 24, 2024 07:29 PM


पुणे,  दि. २४ फेब्रुवारी : नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली परंतु यवतमाळच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी दिलेली कर्जमाफीची गॅरंटीही खोटी निघाली. मोदी सरकारने  शेतकरी, तरुण महिला अशा सर्वांना फसवले. या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले असून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त   केला आहे.. 


पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते, भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले की, २०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहे, हे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत. पुण्यातूनही इंडिया आघाडीचाच खासदार निवडून येणार आहे.


पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतीक वारसा लाभलेले शहर आहे, या शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे. पुण्याची संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात आहे. पुण्याला, महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात अडकवू नका. पुण्यात विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत पण त्यांना आंदोलनाची परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. या मुलांचा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारु, असेही नाना पटोले म्हणाले.   


या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे. माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वंदना चव्हाण,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय जगताप, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, माजी मंत्री शिवसेनेचे नेते सचिन अहिर, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,  प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, आमदार रविंद्र धंगेकर, प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह महाविकास आघाडीस सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.