राज्यातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Gaikwad May 29, 2023 08:14 PM


मुंबई,  :- एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


  मुख्यमंत्री   शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.  


मुंबईतील २२६ धोकादायक इमारतींपैकी २७ इमारतीतील रहिवाश्यांना स्थलांतरित केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री   शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अहवालावर अवलंबून राहू नये. यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळता येईल. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची निवासाची काळजीही घेण्यात यावी. जेणेकरून ते धोकादायक इमारतीतून बाहेर पडण्यासासाठी तयार होतील. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आढावा घेत आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्त्वपूर्ण असे निर्देशही दिले.  


  मुंबईबरोबरच अन्य ठिकाणीही नाले सफाईवर चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास सखल भागात पाणी साचून होणारे नुकसान टाळता येईल. काही अंशी पुराचा धोका टाळता येईल. मुंबईत रेल्वे आणि महापालिकेने नाले सफाईबाबत संयुक्त मोहीम राबवावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय आणि संपर्क राखावा. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठीच्या उपाययोजनांवर लक्ष पुरवण्यात यावे. विविध यंत्रणांकडून सुरु असलेल्या बांधकांमातील राडारोडा-खरमाती वेळीच हटवण्यात यावी. काही कामांच्या ठिकाणी बांधकाम सुरक्षित टप्प्यांपर्यंत (सेफ-लेव्हल) पोहचेल, याची दक्षता घ्यावी. मुंबई उपनगरातील दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून, प्रस्ताव देण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच लष्कर, नौदल, हवाईदल यांच्या मागणीनुसार आपत्ती व्यवस्थापनात जीवितहानी होऊ नये शोध आणि बचाव मोहिमेसाठी आवश्यक अशी उपकरणे तत्काळ उपलब्ध होतील यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. ठाणे, येथे एनडीआरएफसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूर या भागात जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच या दलाचे तळ तेथे प्रभावीपणे कार्यरत होतील, असे निर्देशही देण्यात आले.


 पावसाळ्यात जलसंपदा विभागाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या विभागाने आतापासूनच सतर्क राहावे. कोल्हापूर-सांगली भागातील पुराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क-समन्वय राहावा यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे. संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करावे. नागपूर विभागाने मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून होणारा विसर्ग आणि तेलंगणातील मेडीगट्टाची पातळी याबाबत संपर्क-समन्वय राखावा. ज्यामुळे गडचिरोली आणि अन्य परिसराला पाण्याचा फटका बसणार नाही. मराठवाड्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंबाबत वीज कोसळण्याचा इशारा देणारी – वीज अटकाव (लायटनिंग ॲरेस्टर) यंत्रणा उभारणीबाबत संबंधित सर्वच विभागांनी वेळेत कार्यवाही करावी. जेणेकरून लोकांना वेळेत इशारा मिळेल आणि जिवीतहानी टळेल.


 रेल्वे, महापालिकेला दक्षतेच्या सूचना


मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वे व महापालिकेने समन्वय राखावा. लोहमार्गांवर पाणी साचू नये यासाठी नालेसफाई चांगल्या पद्धतीने होईल यावर भर द्यावा. परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेने बसेसची उपलब्धता, शाळा आणि निवाऱ्याची सोय, पिण्याचे पाणी- अन्नपदार्थ यांबाबत नियोजन करावे. कोकण रेल्वे तसेच कोकणातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याबाबत वेळीच सर्व यंत्रणांना इशारा द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


 मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांनी रेल्वे आणि महापालिकेचा समन्वय राखल्याची माहिती दिली. मुंबईतील परिस्थितीवर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून ६ हजार ४०० कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यातील १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळातील मोठी भरती (हाय टाईड) च्या ५६ दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. जे खड्ड्यांची माहिती मिळताच, पुढच्या सहा तासात खड्डे बुजवतील, असे नियोजन आहे. पाणी तुंबू नये यासाठी सुमारे ५०० पंप्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.


 मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी व पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्रा, कोकण रेल्वेच्या वतीनेही पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण व लोहमार्गांवर लक्ष ठेवण्याबाबत केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. एनडीआरएफची १८, एसडीआरएफची सात पथके, नौदलाची १० पथके, तटरक्षक दलाची ६ पथके, हवाई दलाची मिग ७० हेलीकॉप्टर्स, तसेच या सर्वच पथकांकडे बोटी, उपकरणे अनुषंगीक गोष्टींची सज्जता असल्याची माहिती देण्यात आली.


०००००