मनसेच्या तोडफोड प्रकरणावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राज ठाकरेना टोला ...

Santosh Gaikwad August 22, 2023 03:24 PM


डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरुन सरकारला धारेवर धरले होते. असे आंदोलन करा की सरकारला जाग आली पाहिजे असे आदेशच महाराष्ट्र सैनिकांना दिले होते त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्त्यावरील खड्डयांवरून मनसेकडून तोडफोड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेला पत्र लिहिलं आहे आणि आपली भूमिका मांडली आहे.  मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे असा टोला मंत्री चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.


दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो. याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे असे चव्हाण पत्रात म्हणाले.


जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देशानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.”


“मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे. असे रवींद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.



“या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.”


“ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीरमधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था. त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.


त्यामुळे आता मंत्री चव्हाण यांच्या खरमरीत पत्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे लक्ष वेधले आहे.