सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Gaikwad March 12, 2024 07:18 PM


*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा*


 मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे.  राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून  सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढत देशात व राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित कारभार सुरू असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०१९-२० ते २०२२-२३ मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस येथे झाला. या सोहळ्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते.



समाजाच्या शोषित, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन करीत असल्‍याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शासनाने सामाजिक न्याय विभागासाठी सर्वात जास्त २१ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे.  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण सोडावे लागू नये म्हणून शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शिष्यवृत्तीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी देशात आपल्या राज्यात प्रथमच दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे. लाड समितीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या शिफारशी लागू करण्यात येत आहेत.  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगार, प्रशिक्षण व संशोधनासाठी बार्टी संस्था काम करीत आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठीसुद्धा मदत करण्यात येत आहे.


 मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकात रूपांतर केले. मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. राज्यात रमाई आवास योजनेतून साडेचार लाख घरकुल बांधण्यात आली आहेत. शासनाने नागरिकांना योजनांचा लाभ त्यांच्या जवळ जावून देण्याचे ठरविले आणि शासन आपल्या दारी कायर्क्रम राबविण्यात आला. आतापर्यंत २० कार्यक्रमांमधून  ४ कोटी ६० लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकाभिमुख बनला आहे.  हे शासन आपत्तीमध्ये धावून जात आपत्तीग्रस्त लोकांचे दु:ख दूर करण्याचे काम करीत आहे.  ३ 


*हे  पुरस्कारांचे मानकरी*


  सोहळ्यात वैयक्तिक व संस्था पातळीवर एकूण ३९३  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यापैकी काही पुरस्कारार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार : (वैयक्त‍िक स्तरावर) बापूसाहेब कांबळे, जि. कोल्हापूर, शिवाजी गवई जि. जालना, कृष्णाजी नागपुरे जि. चंद्रपूर, राजू झनके, जिल्हा मुंबई उपनगर, नागसेन कांबळे, जिल्हा मुंबई शहर, (संस्था स्तरावर) श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण जि. सातारा, पब्लिक वेलफेअर सोसायटी जि. नागपूर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार :  (वैयक्त‍िक स्तरावर) पोपटराव साठे, जि. अहमदनगर, रावसाहेब कदम जि. ठाणे, (संस्था स्तरावर) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार : (वैयक्त‍िक स्तरावर)  धोंडिरामसिंह राजपूत छत्रपती संभाजीनगर, (संस्था स्तरावर)  क्रांतिसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हाडगा, ता. निलंगा, जि. लातूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार :  संस्था स्तरावर कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वोदय वसतिगृह कासेगाव ता. वाळवा जि. सांगली, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक : संस्था स्तरावर सतचिकित्सा प्रसारक मंडळ, यवतमाळ, संत रविदास पुरस्कार : वैयक्त‍िक स्तरावर श्वेता दाभोळकर ठाणे, संस्था स्तरावर शिवकृपा समाज सेवा मंडळ, लातूर यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री   शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.