फर्निचर घेाटाळयाची फेब्रुवारीमध्ये लोकायुक्तांकडे सुनावणी !

Santosh Gaikwad December 22, 2023 06:05 PM


मुंबई :  मुंबई महानगर पालिकेतील २६३ कोटी रूपयांच्या स्ट्रीट फर्निचरमध्ये झालेल्या घोटाळयाप्रकरणाची लोकायुक्तांनी दखल घेतली असून, फेब्रुवारी २०२४ मध्ये लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे या सुनावणीच्यावेळी मला बोलावलं असून, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही बोलावण्यात आलं आहे अशी माहिती शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  त्यामुळे आता लवकरच महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळयावर  कारवाई होईल अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. 

 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागच्या दोन आठवडयापूर्वी मी लोकायुक्तांना पत्र लिहिलं होतं. २६३ कोटी रूपयांचा स्ट्रीट घोटाळा झाल्याची माहिती कळवली होती. आजच मला लेाकायुक्तांकडून उत्तर आलं असून फेबुवारी महिन्यात त्याची सुनावणी ठेवण्यात आली असून त्यासाठी मला उपस्थित राहावं लागणार आहे. नगरविकास विभागाचे सचिव आणि मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त   यांना देखील उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.  कारण आतापर्यंत ते उत्तर द्यायला पुढे येत नाही", अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.


पावसाळी अधिवेशनात घटनाबाहय मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणाची चौकशी लावलेली आहे. मात्र ती चौकशी होत आहे की नाही. कुणाची चौकशी केली. कुणी कुणाला काय प्रश्न केले, याची कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


भाजप आमदारांनी सभागृहात सांगितलं होतं की हे टेंडर रद्द झालं मात्र असं कुठेही न होता. कंत्राटदाराला २२ की २५ कोटी दिले आहेत. काम थांबलेले आहे, पण हे इतके रूपये कशासाठी दिले आहेत. त्याच्यावर उत्तर आलेलं नाही. पुढे कारवाई झाली आहे का ? डिपॉझिट जप्त झालं आहे का ? तर त्यांचही उत्तर आलेलं नाही म्हणून हे प्रश्न आम्ही लेाकांयुक्तांसमोर उपस्थित करू असेही ठाकरे यांनी सांगितले.


 नवी मुंबई मेट्रो चे काम पाच महिले तसेच आहे आठ महिन्यांपासून दिघा स्टेशन तयार आहे पण व्हीआयपींना उद्घाटनाला वेळ मिळत नाही घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उदघाटन करता येत नाहीये तुम्ही राज्याचा काय करणार ? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित करीत मुख्यमंत्रयांवर निशाणा साधला. 


दिल्लीश्वरांच्या आदेशाने लूट होऊ देणार नाही ..

ज्या रस्त्याच कंत्राट रद्द केले ते कंत्राटदार कोर्टात गेले आहे. नवीन रस्त्याचा निविदा काढली त्यात ३०० कोटी कमी केले आहे.आधीच कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडर वर स्टे आणला आहे.११ जानेवारी पर्यत टेंडर वर स्थिगिती आहे.  आयुक्तांसोबत आम्ही यावर चर्चा करायला तयार आहोत किती रस्ते झाले ते दाखवा. रस्ते पूर्ण होणार नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर चा फरक मुख्यमंत्री यांना कळत नाही.  आम्ही ज्या मुंबई महाराष्ट्रासाठी लढत आहेात त्यांना न्याय मिळेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त करीत, आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर सुरू आहे. मात्र, मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही असेही ठणकावले.

------------------