विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल ; अजित पवार यांनी काढले सरकारच्या कारभाराचे वाभाडे

Santosh Gaikwad March 24, 2023 12:00 AM

मुंबई, दि. २४ : नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, विकासाचा वेग डबल होईल, म्हणून सांगितलं गेलं. मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे,  असा आरोप करुन राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत, सरकारकडून कणखर भूमीका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. 


विरोधी पक्षनेते अजित पवार नियम 292 अन्वये विरोधी पक्षाच्यावतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत आहेत.  तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरुन दहशत निर्माण करत आहेत. खून, दरोडे, अपहरण, हत्या, घरफोड्यांनी राज्यातले नागरीक हवालदिल झाले आहेत. जुगार, मटका, गुटखा, डान्स बार हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर, महिला आमदारांवर हल्ले सुरु आहेत.  धार्मिक वाद निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात पुन्हा गँगस्टरनी डोके वर काढले आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत.  पुण्यात कोयता गँगचा अजूनही पुरता बंदोबस्त झालेला नाही. कोयता गँगची दहशत वाढली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुध्दा कोयता गँगने हातपाय पसरलेले आहेत. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड फिरतात, हल्ले करतात.  विशेष पोलीस आयुक्तांचं नवीन पद मिळाल्याने मुंबईतली गुंडगिरी कमी होईल, असं वाटलं होतं. उलट, आता तलवारी घेऊन, दिवसा राजरोस गुंड फिरत आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यवसायिक आपले व्यवसाय करु शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का ? काही गुंडांना नुसती अटक करुन उपयोग नाही. याची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये. 


भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा या सरकारने आतापर्यंत अनेकवेळा केल्या.  परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये खुलेआम हप्तेखोरी सुरु आहे. मोक्का दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्याने दीड पेटीची (दीड लाख) मागणी केली. पोलिस कर्मचारी व गुन्हेगाराच्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या हप्ता खोरीला आळा घालण्याऐवजी ऐवजी पोलीस आयुक्तांनी विशेष पथक बरखास्त करुन टाकलं आहे. राज्यात खुलेआम हप्ताबाजी सुरु झाली आहे. राज्यात मटका, जुगार, गुटखा, डान्स बार यांना बंदी आहे.  मात्र राज्यातल्या अनेक भागात हे सर्व धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तसेच राज्यात ऑनलाईन लॉटरी, रमीचे प्रमाण वाढले आहे. या जुगारातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक होत आहे. तसेच तरुण पिढी या ऑनलाईन रमीकडे वळत आहे. या ऑनलाईन रमीची जाहिरात काही अभिनेते, अभिनेत्र्या करत आहेत. त्यामुळे तरुण या जाळ्यात अडकत आहेत. यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्या जातात.  पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याच धतीवर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे. 


‘लव्ह जिहाद’वरुन सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न...


उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेश पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणलाही अधिकार नाही. इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणाचा मुद्दा मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता.  आदिवासी मुलींची वेठबिगारीसाठी विक्री होते, त्यांचे शोषण केले जाते. मी अशीही मागणी केली होती की, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावं. एवढा गंभीर गुन्हा असताना शासकीय यंत्रणा मात्र गंभीर नाही. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगापुढे अधिकारी हजरच झाले नाहीत. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला हे शोभणारे नाही. 

   

महाराष्ट्रात रोज  ३८ महिला बेपत्ता होताहेत... 


महिला अत्याचाराचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो.  पण अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट त्यात वाढ होते आहे. एकट्या मुंबईत महिला अत्याचाराच्या वर्षभरात 6 हजार 133 गुन्हे नोंद झाले.  614 अल्पवयीन मुली आणि 984 महिला विकृत वासनेच्या शिकार झाल्या.  1 हजार 598 पैकी 912 गुन्हे उघडकीस आले.  686 प्रकरणात तर आरोपीही सापडले नाहीत. 1 हजार 164 मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी 1 हजार 47 मुली सापडल्या.  117 मुली अजून पोलिसांना सापडलेल्या नाहीत. ही मुंबईची स्थिती आहे. शाळेतल्या मुलींवर अत्याचार होत आहेत.  महिलांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचार घटनांतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टासमोर हजर करुन त्यांना फाशीची शिक्षा द्या. "शक्ती कायद्या" ला अजून केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही.  ती मंजुरी लवकरात लवकर मिळवा. तसेच महाराष्ट्रातून रोज 38 महिला-मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर बाब आहे. 


राजकीय नेते, पत्रकारांवर हल्ले ..


राज्यात धमक्यांचे पेव फुटले आहे. मात्र धमक्या देणाऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई पोलिसांकडून होत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या.  अंबानी हॉस्पिटलला धमकी आली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली.  गेले सहा महिने धमक्यांचे सत्र सुरु आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्यांना जरब बसेल, अशी कारवाई सरकारकडून झाली  पाहिजे आणि हे सत्र थांबले पाहिजे. कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली.  राज्यात पत्रकाराची हत्या हा लोकशाहीवरचा हल्ला आहे.  या हत्येमागील सर्व बाजूंचा तपास झाला पाहिजे आणि केवळ हल्लेखोर आंबेरकर नाही तर त्याच्यापाठीमागचा मास्टरमाईंड सापडला पाहिजे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.  एका बाजूला पक्षात ओढण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर होतो आहेच, केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा त्यांच्या पाठीमागे लावला जातो आहे. आता विरोधकांवर हल्ले होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि महिला आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्यावर भ्याड हल्ला झाला. या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. एका महिला आमदारावर हल्ला होतोच कसा ? याच उत्तर सत्ताधाऱ्यांना द्याव लागेल. 

  

गृहमंत्र्यांच्याच पत्नीला लाच देण्याचा प्रयत्न


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या पत्नीला एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही संपूर्ण सभागृहाची मागणी आहे. चौकशीतून सत्य बाहेर आले पाहिजे. मात्र याप्रकरणाची चौकशी सुरू झाली नसताना त्या आधीच विरोधकांचा यात हात असावा, अशी वक्तव्यं केली जात आहेत. हे दुर्दैवी आहे. या प्रकरणातील मुलगी आंतरराष्ट्रीय बुकी अनिल जयसिंगानीची मुलगी आहे.  मागील 5 वर्ष आणि आताही आपण गृहमंत्री आहात.   हे प्रकरण वर्ष दोन वर्षापासून सुरु आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मुलगी गृहमंत्र्यांच्या घरात थेट कशी येऊ शकते, असे अनेक प्रश्न आहेत. या बुकी जयसिंघानीचे दहशतवदी दाऊद सोबतही संबंध असल्याचे बोलले जाते.  त्यामुळे याची सखोल चौकशी करुन सत्य राज्यातल्या जनतेला समजले पाहिजे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते.  दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती.  मात्र ती आपल्या काळात सुरू झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. आमदार अनिल परब, हसन मुश्रीफ, अनेक विरोधी आमदारांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे. हाच कणखरपणा दाखवा. आपल्याला राजकारण करण्यासाठी मोठे मैदान आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर उतरण्याची आवश्यकता नाही. चला पुन्हा एकदा एक नवीन चांगली संस्कृती या निमित्ताने पुरोगामी महाराष्ट्रात सुरू करू असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.