पंतप्रधानांच्या डिग्रीपेक्षा महागाई, बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा : अजित पवार

Santosh Gaikwad April 03, 2023 07:23 PM

मुंबई दि. ३ एप्रिल  :  सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले . शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे डिग्री या विषयाला फार महत्व द्यावे असे मला वाटत नाही असे राज्याचे  विरोधी  पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. 


अजित पवार म्हणाले की,  देशाचे पंतप्रधान एकशे पस्तीस कोटी जनतेचे असतात. त्यामुळे बाहेर गेल्यावर आपल्या पंतप्रधानांबद्दल मी आदरानेच बोलतअसतो असे अजित पवार यांनी स्पष्ट करीत, नरेंद्र मोदी यांची २०१४ ला डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का?  त्यांनी देशात स्वतः चा करिष्मा निर्माण केला. जो भाजपचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता असा टोला लगावतानाच याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. डिग्रीवर काय आहे. आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो. त्यामुळे शिक्षणाच्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात पदवी झाल्याशिवाय काम करु शकत नाही. असे राजकारणात नाही त्यामुळे ते आज ९ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही. महागाई आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाला अधिक महत्व दिले पाहिजे असे पवार म्हणाले. 

राज्य सरकारकडून जाहिरातीवर ५५ कोटी नाही तर १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे. कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे - सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाले ती मदत मिळाली नाही. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्‍या तमाम शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणात काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

केंद्रात, राज्यात तुमची सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय ? अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत. असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. वीर सावरकर गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशा शब्दात अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्या अनिल बोंडेना सांगा तपास करा. 'दूध का दूध पानी का पानी' येऊ द्या लोकांसमोर... वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे.. यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षावाला हा माझाच शब्द आहे पवारसाहेबांचा नाही. मी पवारसाहेब यांचे नाव घेतले पण शब्द माझा... उध्दवजी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होते असे म्हटले होते त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी क्लीअर केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.