फिरकीनं भारतीय फलंदाजांना गुंडाळलं; ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली, भारताचा दारुण पराभव

Santosh Sakpal March 23, 2023 12:00 AM

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या मालिकेच्या झालेल्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने २-१ ने आघाडी घेत या मालिकेवर विजय संपादन केलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात २७० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. अॅडम झॅम्पाच्या फिरकीपुढं भारतीय फलंदाज ढेर झाले. झॅम्पाने ४ तर एगरने २ विकेट घेत भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे भारताचा डाव गडगडला आणि ४९. १ षटकात २४८ धावांवर भारताचा आख्खा संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून तिसऱ्या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला आणि मालीका २-१ ने जिंकली.  तिसऱ्या वनडेत भारताला पराभवचा धक्का बसला. पण यापेक्षा मोठा धक्का भारताला सामना संपल्यावर बसला आहे. 

भारताला पराभवामुळे आपले आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थान गमावले; आता भारताकडून हे अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे.

तिसऱ्या सामन्यात भारताला २७० धावांची गरज होती. भारताला या सामन्यात सुरुवात चांगली मिळाली होती. रोहित आणि शुभमन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. पण रोहित ३० आणि गिल ३७ धावांवर बाद झाले आणि भारताला दुहेरी धक्के बसले. पण त्यानंतर विराट कोहलीने संघाचा डाव सावरला होता. कोहलीने अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे हा सामना भारतीय संघ जिंकेल, असे वाटत होते. पण एक मोठा फटका मारताना कोहली बाद झाला आणि त्यामुळे हा सामना फिरला. कोहली बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने चांगलीच कंबर कसली आणि त्यांनी भारताला विजयापासून परावृत्त केले. पण या पराभवानंतर भारतीय संघाने आपला ताज गमावला आहे.

कर्णधार रोहित शर्माने आणि शुबमन गिलने भारताला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. पण एबॉटने रोहितला तर झॅम्पाने शुबमन गिलला बाद केल्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाज तंबूत परतले. मात्र, विराट कोहलीने कांगांरुंचा समाचार घेत अप्रतिम खेळी केली. ७२ चेंडूत ५४ धावा करून विराटने भारताला विजयाच्या दिशेनं नेलं होतं. राहुलनेही विराटसोबत सावध खेळी केली. पण दोघेही बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही तिसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. एगरने सूर्यकुमारला तंबूत पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर हार्दिकने भारताची कमान सांभाळत ४० चेंडूत ४० धावा केल्या. मात्र, झॅम्पाने हार्दिकला आणि रविंद्रे जडेजाला बाद करून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित केला होता.


भारताचा कर्णधार रोहित शर्माने १७ चेंडूत ३० धावा केल्या. तर सलामीवीर फलंदाज शुबमनने ४९ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली. पण हे दोघेही सलामीवीर फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. विराटसोबत के एल राहुलनेही धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. के एल राहुलने ५० चेंडूत ३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियच्या एबॉटने रोहितला बाद केलं. तर अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर शुबमन गिल आणि के एल राहुल बाद झाला. विराट अर्धशतकी खेळी करून चांगल्या लयमध्ये खेळत होता.

पण विराटला एगरने ५४ धावांवर असताना झेलबाद केलं. त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्यालाही धावांचा सूर गवसला नाही आणि तो अवघ्या २ धावांवर रनआऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. ७ नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला एगरने क्लीन बोल्ड केलं.

हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ हा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. कारण या पराभवानंतर त्यांचे अव्वल स्थान हिरवले गेले आहे. भारताला पराभवामुळे आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आता भारताकडून हे अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाच्या संघाचे या क्रमवारीत ११३ गुण झाले आहेत. या क्रमवारीत भारताचेही ११३ गुण झाले आहेत. पण ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा कमी सामने खेळले आहेत आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ३५ सामन्यांमध्ये ११३ गुण पटकावले आहे आणि हेच ११३ गुण कमावण्यासाठी भारताला ४७ सामने खेळावे लागले आहेत. त्यामुळे कमी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने जास्त गुण कमावले आहेत आणि त्यामुळेच त्यांना अव्वल स्थान आयसीसीने दिले आहे.