राज्यात सहा महिन्यात दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

Santosh Gaikwad September 21, 2023 04:39 PM

 
शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली :  विरोधी पक्षनेत्याचा  निशाणा 
 

मुंबई दि,२१ : राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याने आगामी काळात महाराष्ट्रावर दुष्काळाचं मोठं संकट  येऊन ठेपल आहे.  राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  या परिस्थितीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही ? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. केवळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं हाच महायुती सरकारचा पॅटर्न असल्याची खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. अमरावती विभागात सगळ्यात जास्त ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अमरावतीत १८३, बुलढाणा १७३, यवतमाळ १४९, अकोला ९४,  वाशीम ३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. औरंगाबाद विभागात ५८४ शेतकऱयांनी आत्महत्या केली. यात बीडमध्ये १५५, उस्मानाबाद १०२, नांदेड ९९,औरंगाबाद ८६,परभणी ५१,जालना ३६, लातूर ३५, हिंगोलीत २० शेतकऱ्यांनी आपल जीवन संपवल आहे. तर  नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या केल्या यात चंद्रपूर ७३,वर्धा ५०,नागपूर १३,भंडारा ५ आणि गोंदिया ३ शेतकरयांनी आपली जीवनयात्रा संपवली. नाशिक विभागात १७४  शेतकरी आत्महत्या केल्या  यात जळगावमध्ये ९३, अहमदनगरमध्ये  ४३, धुळे २८, नाशिक ७ , नंदुरबारमध्ये ३ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या  आहेत. पुणे विभागात १६ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या यात सोलापूर १३, सातारा २, सांगलीत एका शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. 
     
*पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदिल* 

वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगलीतही सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. नांदेडमध्ये सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस. सोलापुर सरासरीच्या ३५ टक्के कमी पाऊस,  सातारा सरासरीच्या ४० टक्के कमी, छत्रपती_संभाजीनगर सरासरी २७ टक्के कमी, जालना सरासरीच्या ४३ टक्के कमी, बीडमध्ये सरासरीच्या ४३ टक्के कमी, धाराशिवमध्ये सरासरीच्या ३२ टक्के कमी, परभणी सरासरीच्या ३१ टक्के कमी,अमरावती सरासरीच्या ३० टक्के कमी, वाशिम सरासरीच्या २२ टक्के कमी, अकोला सरासरीच्या २९ टक्के कमी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 
       
*जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या*

 जानेवारीत  २२६ , फेब्रुवारी १९२ ,मार्च २२६  ,एप्रिल २२५, मे २२४, जून २३३, जुलै २२९  शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून  विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रिपल इंजिन सरकार टीका केली आहे.