भाजप सत्तेवर आल्यास, देशात पून्हा निवडणूका होणार नाहीत ... परकला प्रभाकर यांचे मोठं विधान

Santosh Gaikwad April 08, 2024 05:46 PM


मुंबई : देशात आज २०२४ ची निवडणूक होत आहे. यामध्ये जर हे सरकार पुन्हा आले तर यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. तुमच्याकडे असलेले देशाचे संविधान आणि नकाशा पूर्णपणे बदलेल. तुम्हाला ते ओळखताही येणार नाही. असे धक्कादायक विधान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी केले आहे. 

परकला प्रभाकर यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परकला प्रभाकर यांनी हा दावा केला आहे.


देशात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ‘४०० पार’चा नारा दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे.  तर दुसरीकडे मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी इंडिया आघाडीची एकजूटली आहे. त्यातच परकला प्रभाकर यांचे विधान खळबळ उडवणारे आहे.


परकला प्रभाकर नेमके काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पुढे काय होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर परकला प्रभाकर म्हणाले, “जर असे झाले तर पुन्हा निवडणुकीची अपेक्षा तुम्ही करु नका. आता २०२४ ची निवडणूक होत आहे. यामध्ये जर हे सरकार पुन्हा आले तर यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. तुमच्याकडे असलेले देशाचे संविधान आणि नकाशा पूर्णपणे बदलेल. तुम्हाला ते ओळखताही येणार नाही. आता जे तुम्ही काही ऐकता एखाद्याला पाकिस्तानला पाठवा, त्याला तिकडे पाठवा. पण यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळेल. आता जे मणिपूरमध्ये होत आहे. उद्या ते आपल्या परिसरातही होऊ शकते. आता मणिपूर, लडाखमध्ये जी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती संपूर्ण देशात होईल”, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे.
https://x.com/INCIndia/status/1776916666124795946