माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर गंभीर आरोप !

Santosh Gaikwad October 15, 2023 05:36 PM


मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकामधून अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आता एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, याच पुस्तकांत त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी त्यांचे नाव न घेता केला आहे.दरम्यान अजित पवार यांनी हे आरोप फेटाळले आहे मात्र या आरोपाने राजकीय वातावरण तापलं असून विरोधक आक्रमक झाले आहेत.  


पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असे स्पष्टपणे या पुस्तकांत लिहिण्यात आले आहे.


तसेच, कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मात्र मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांच्याकडून करण्यात आला आहे. बोरवणकर यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.


मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये अजित पवार यांचे थेट नाव नसले तरी २०१० मध्ये तेच पुण्याचे पालकमंत्री होते. ज्यामुळे पुण्याच्या पालकमंत्र्यांचे थेट नाव आरोपांमध्ये घेण्यात आले नसले तरी मीरा बोरवणकर यांनी सांगितलेले पालकमंत्री हे अजित पवारचं आहेत, हे मात्र जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता माजी आयपीएस अधिकाऱ्यांनीच थेट आरोप केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, आता या आरोपांनंतर अजित पवारांची चौकशी करण्यात येणार की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.


*अजित पवारांनी आरोप फेटाळले*

अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलताना जागेच्या लिलावात त्यांचा कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. मी अशा प्रकारच्या लिलावांचा विरोध केलेला आहे. पालकमंत्र्यांना जमिनीचे लिलाव करण्याचा अधिकार नसतो. सरकारी जमिनी आपण विकू शकत नाही. महसूल विभागाकडे ती प्रकरण जातात आणि राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होतात, असं अजित पवार यांनी म्हटलं. माझा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, असं देखील अजित पवार म्हणाले. तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बघा मी अशा प्रकरणांमध्ये शासनाची बाजू घेतलेली आहे. माझ्यावर तशा प्रकरणांमध्ये दबाव आणला तरी मी त्याची फिकीर करत नाही असं अजित पवार म्हणाले.


*पुस्तकांत जे काही लिहिले असेल ते वास्तव आहे : नाना पटोले*

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातल्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सत्तेत बसलेल्या राजकर्त्यांविषयी मोठा उद्रेक आहे. तीन ते चार महिन्यात बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाच्या प्रशासनाची जी पकड असली पाहिजे, ती पकड संपत चालली आहे आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मीरा बोरवणकर यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाटते की, राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणार, सुरक्षेचे वातावरण ठेवणार पण हे सरकार फक्त बदल्या करण्यात मग्न आहे. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकांत जे काही लिहिले असेल ते वास्तव आहे, असे नाना पटोले म्हणाले.


*आता ईडी, देवेंद्र फडणवीस, आर्थिक गुन्हे शाखा काय करणार : संजय राऊत* 

 ठाकरे गटाचे खासदार यांनी या प्रकरणी बोलताना म्हटले आहे की, आता ईडी, देवेंद्र फडणवीस, आर्थिक गुन्हे शाखा काय करणार आहे? हा प्रश्न तुम्ही माझ्याऐवजी सरकारला भाजपा नेत्यांना विचारायला हवा. ज्या व्यक्तींना तुम्ही सोबत बसवले आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असो की त्यांच्यासोबतच ४० अलिबाबा आणि चाळीस चोर असोत किंवा अजित पवार आणि त्यांचे ४० चोर असोत. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी दावा करत आहे की, सरकारी जमीन त्यांना लाटायची होती. भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चारित्र्य कसे आहे हे सगळ्यांना माहिती आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.