ठाकरे, पवारानंतर आता शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर !

Santosh Gaikwad July 13, 2023 06:21 PM


मुंबई : आगामी  लोकसभा व विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही  लागू शकतात याच दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींचे महाराष्ट्रव्यापी दौरे सुरू झाले आहेत.  ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यानंतर  आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  गुरूवारी (आज) ठाण्यापासून  दौऱ्याची सुरूवात केली.  यावेळी टीप टॉप प्लाझा मध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला.  त्यानंतर १४ जुलैला कोल्हापूर शहरात पेटला मैदान येथे जाहीर सभा होणार आहे, तर पुण्यात सकाळी मेळावा होणार आहे. तर १५ तारखेला नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्तांचा मेळावा होणार आहे.  


शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर हे प्रकरण  कोर्टात गेलं. त्यानंतर उध्दव ठाकरे यांना पक्षाचे नाव आण  चिन्ह गमवावे लागले. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेशासाठी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी खिंडार पडली असून  गळती सुरूच आहे. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी उध्दव ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विदर्भाचा दौरा केला, शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादीमध्येही मोठी खिंडार पडली, अजित पवार गटाने शिंदे सरकारला पाठींबा देत सरकारमध्ये सामील झाले अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे, अजित पवार यांनीही राष्ट्रवादी पक्षावर आण  चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीही खिळखिळी करण्यात आली आहे, पक्षाच्या बांधणीसाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मैदानात उतरले असून महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.  शरद पवारांनी  कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दौ-याला सुरूवात केली. त्यानंतर नाशिक येथील छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात पवारांनी सभा घेतली. कार्यकर्ते नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन आहे.


ठाकरे पवारानंतर आता मुख्यमंत्री शिंदे हे सुध्दा महाराष्ट्चा दौरा करीत  आहे. ठाणे या त्यांच्या होम पीचवरूनच मुख्यमंत्रयांनी दौ-याला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत.  तसेच भाजपकडूनही सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे आयोजित करण्यात आली आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. आजपासून ते दोन दिवसीय दापोली आणि चिपळून दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी आगामी निवडणूकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.