अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशीही अजित पवार मंत्रालयात !

Santosh Gaikwad August 05, 2023 03:31 PM


मुंबई, दि. ५ ऑगस्ट - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पावसाळी अधिवेशन संपताच आज सुट्टीच्या दिवशी जनतेच्या कामांचा निपटारा करण्यासाठी मंत्रालयात आले होते. जनतेची कामे रखडता कामा नये यासाठी शनिवारी ( ५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजताच मंत्रालयात येऊन नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. 


विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशिरा संपले. मात्र जनतेला विधानभवनात येऊन भेटता आले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आठ वाजता थेट मंत्रालय गाठले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे, निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती हे लक्षात घेऊन अधिवेशन संपताच अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने अजितदादा पवारांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा बघायला मिळाला.