तीन दिवसात दुसरी भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटूंब पंतप्रधान मोदींच्या भेटीला !

Santosh Gaikwad July 22, 2023 08:37 PM

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटूंब भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासनही यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तीन दिवसांपूर्वीच एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत उपस्थित होते. त्यानंतर आज दुस-यांदा मुख्यमंत्री सहकुटूंब पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा व्यक्त होत आहे. 


आज मुख्यमंत्री  शिंदे यांनी प्रधानमंत्री मोदी यांची त्यांच्या ७ लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे वडील संभाजी शिंदे, सुविद्य पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे  नातु रूद्रांश यांच्या समवेत भेट घेतली. या भेटी दरम्यान कुटुंबीयांची प्रधानमंत्री यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या ईशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदन प्रधानमंत्री  मोंदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना प्रधानमंत्री यांनी यावेळी व्यक्त केल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली. 


धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी यांनी   शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांचे रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर  मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान प्रधानमंत्री यांनी व्यक्त केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 


राज्यातील रखडलेले पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना प्रधानमंत्री   मोदी यांनी यावेळी केल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासह राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही प्रधानमंत्री यांनी  विचारपूस केली. कोकणात येणारा उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली.  मराठवाडा  वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती मोदी यांनी  घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.