आर्टिफिशल इंटेलिजेंसचा कलाविष्कारावर काहीच परिणाम होणार नाहीः देवेंद्र फडणवीस
Santosh Gaikwad
January 08, 2024 07:33 PM
चिंचवड - (श्रीराम खाडिलकर याजकडून) - संवेदनशीलता समाजात राहिली पाहिजे. ती टिकवण्याचे कार्य तुम्ही करत आहात. ते महत्वाचे आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
शंभराव्या आ. भा. मराठी नाट्य नाट्यसंमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे असे म्हणाले की आर्टिफिशल इंटेलिजन्स कडे इमोशनल नाही. त्यामुळे मानवी संवेदना ते कधीच देऊ शकत नाहीत म्हणूनच आर्टिफिशल इंटेलिजन्स कितीही आलं तरी कलाविष्कारांवर काहीच परिणाम होणार नाही.
ते पुढे म्हणाले की वृद्ध कलावंतांकरता जे काही केलं पाहिजे असे वाटते आहे त्याचा आराखडा तयार करा, आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना देखील मदत करता येईल. कला साहित्य नाट्य संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात कुठल्याही राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिक दृष्ट्या संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपल्या समाज समृद्ध झाला पाहिजे आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभेला तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चित आम्हाला या ठिकाणी या चळवळीच्या पाठीशी उभे राहू आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ अर्थ बळ हे त्याच्या पाठीशी उभ करू. एवढंच या निमित्ताने सांगतो.
पिंपरी चिंचवडचे हे संमेलन भाऊसाहेब भोईर यांनी उत्तम आयोजन केलं त्याबद्दल आयोजकांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
या क्षेत्रात बदल व्हावा हा संकल्प करुनच आम्ही इथे आलो आहोत. असे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.नाट्य कोषाच्या दहाव्या खंडाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आले.
पाचवी ते दहावीच्या मुलांना नाटक, संगीत, चित्रकला हे विषय शिकवले जावेत. रिसर्च साठी ग्रँड द्यावी. तसेच किमान दोन तरी फ्रेंच नाटके सादर केली जावीत, त्यातून चांगले असा विश्वास शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.
ज्या राजकीय विचारांनी, घटनांनी आपले जीवन प्रभावित होते त्या विषयाचे गांभीर्य नाट्यलेखनातून व्हायला हवे. असे मसापचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निवडणूक न लढवता नाट्य संमेलनाचा झालेला पहिला अध्यक्ष म्हणजे आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल साहेब डॉक्टर जब्बार पटेल यांचा सन्मान प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी केला.
मसापचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, आ. उमाबाई कापरे, आ. महेश लांडगे आदींचे सत्कार या प्रसंगी करण्यात आले. त्यापूर्वी नटराजाचे आणि घंटेचे पूजन करण्यात आले. सांगलीमध्ये या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली तिथून नटराज आणि ही घंटा पुण्याच्या शाखेकडे विधीवत सुपूर्द करण्यात आली आणि तिथून पिंपरी चिंचवड शाखेकडे सुपूर्द केली. पुढचे विभागीय संमेलन सोलापूरमध्ये होणार असल्याने या हस्तांतरण सोहळ्यात सोलापूर शाखेकडे सुपूर्द करण्यात आले.