*तब्बल १७ तासांनंतर अजित पवार अवतरले.. म्हणाले, तब्बेत बरी नसल्याने घरी होतो !

Santosh Gaikwad April 08, 2023 11:23 AM


मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे तब्बल १७ तासानंतर अवतरले असून त्यांनी शनिवारी सकाळी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. शुक्रवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली होती. मात्र यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. महाराष्ट्रभर दौरे, जागर जागरणामुळे पित्ताचा त्रास वाढल्याने तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो अस पवार यांनी सांगितलं.मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचनाही अजित पवार यांनी माध्यमांना केली आहे. 


अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आपले सर्व कार्यक्रम रद्द केले, त्यानंतर त्यांनी त्यांचा कॅनव्हॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीतून रवाना झाले होते. त्यांच्या सोबत सहा ते सात आमदार असल्याची चर्चा रंगली होती.  दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सकाळच्या शपथविधीचा फोटो पोस्ट करीत ट्विट केलं होत. 'मी पुन्हा येईन, किसळवाणी राजकारण' असं कॅप्शन त्यांनी आपल्या या फोटोला दिलं. दमानिया यांच्या ट्विटमुळे  राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं होत. एकनाथ शिंदेनी ४० आमदारांसह बंड केले होते,  अजित पवारांचे असे बंड तर नाही ना ? अशी चर्चा सोशल मीडियावर  रंगली होती. अखेर तब्बल १७ तासानंतर अजित पवार पण्यात प्रकटले. पुण्यातील एका ज्वेलर्स च्या उद्घाटनाला त्यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी तब्बेत बरी नसल्याने घरीच असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

*चुकीच्या बातम्यांमुळे व्यथित झालो : पवार* 

अजित पवार म्हणाले की,  काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो अशा शब्दात आपली नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच माध्यमांनी खात्री करुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना अजित पवार यांनी माध्यमांना केली.


-----