मुंबईकरांच्या चॅटबॉटवर ५ हजार तक्रारींचा निपटारा : कच-याची तक्रार या क्रमांकावर नोंदवा !

Santosh Gaikwad August 02, 2023 08:18 PM


मुंबई : मुंबईतील स्वच्छतेसाठी निर्देश देताना नागरिकांना कचऱयाच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी  हेल्‍पलाईन उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.  मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचा निपटारा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. व्हॉट्सएप हेल्पलाईनवर जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ५१६२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी घनकचरा विभागाशी संबंधित ५०२३ तक्रारी आल्या होत्या. तक्रारींपैकी ५०१८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.


मुंबईत दररोज ६ हजार २५ मेट्रिक टन  कचरा गोळा होतो. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून वाहून नेला जातो. मुंबईकरांच्या सेवेत नव्याने आणखी ३२ कॉम्पॅक्टर वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी कचरा वाहून नेण्याची यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे सुरू राहण्यासाठी मदत होईल. मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्‍या कचरा विषयक तक्रारींची नोंद ८१६९६-८१६९७ या हेल्‍पलाईन क्रमांकावर नोंदविली जात आहे. संबंधितांनी छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती पाठविल्‍यास तत्‍काळ त्‍याचे निराकरण केले जात आहे. 


मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात घनकचऱयाच्या तक्रारींचा निपटारा करण्याबाबत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पावसाळ्याच्‍या काळात कचऱयाची योग्‍यपणे विल्‍हेवाट लावावी, कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे, असे निर्देशही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्‍त आयुक्‍त पी.वेलरासू यांनी सर्व उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यास दिले. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्‍पलाईन सुरू केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्‍या कचरा विषयक तक्रारींची नोंद ८१६९६-८१६९७ या हेल्‍पलाईन क्रमांकावर नोंदविली जात आहे. संबंधितांनी छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती पाठविल्‍यास तत्‍काळ त्‍याचे निराकरण केले जात आहे. पावसाळ्यात कच-याविषयक समस्‍या उद्भवू शकतात. संभाव्‍य परिस्थिती विचारात घेता सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कचरा समस्‍या मार्गी लावावी. अधिक मनुष्‍यबळचा वापर करत, प्रसंगी वाहनांच्‍या फे-या वाढवून कचरा संकलन आणि वाहतूक अधिक क्षमतेने करावी. अधिका-यांनी आपापल्‍या विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी करावी. जागच्‍या जागी समस्‍येचे निराकरण करावे, असेही  पी. वेलरासू यांनी सांगितले.


 सध्या संपूर्ण मुंबई महानगरातील सर्व विभागातून सहा हजार मेट्रिक टन कचरा कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे पाठवला जातो. सरासरी ८०० मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमी येथे पाठविण्यात येतो. दैनंदिन कचरा, गाळ आणि राडारोडा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया एकूण वाहनांमध्ये २४६ महानगरपालिकेची वाहने तर ठेकेदाराची १६९४ वाहने वापरण्यात येतात. या वाहनांमध्ये नव्या कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने ३२ कॉम्पॅक्टर वाहने ताफ्यात दाखल झाल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  चंदा जाधव यांनी दिली. मुंबईतील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अधिक गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम सेवा देण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता  प्रशांत तायशेटे यांनी दिली.


एका कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून सध्या ६ मेट्रिक टन कचरा नेण्यात येतो. गेल्या आठवड्यात मुंबईतील विविध विभागांसाठी उपलब्ध झालेल्या ३२ कॉम्पॅक्टरमुळे घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत अधिकाधिक चोखपणे काम करणे विभागाला शक्य होईल. तसेच ठिकठिकाणी साचणाऱया कचऱयाच्या समस्येवर तत्काळ कार्यवाही करणेही शक्य होईल. एकूण ३२ कॉम्पॅक्टर वाहनांपैकी शहरासाठी ६, पश्चिम उपनगरे ११ आणि पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत.