शिंदे गटाच्या किती खासदारांना उमेदवारी मिळणार, चर्चांना उधाण, मंगळवारी यादी जाहीर होणार !

Santosh Gaikwad March 25, 2024 08:02 PM


मुंबई : लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र महायुती आणि महाआघाडीतील जागा वाटपांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मंगळवार  २६ मार्चपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जागा वाटपात शिंदे गटाची कोंडी झाल्याचे दिसून येतय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरूंग लावल्यानंतर १३ खासदारांनी त्यांना पाठींबा दिला होता. मात्र त्यातील अनेक खासदारांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यात धाकधूक आहे. त्यामुळे किती जणांचा पत्ता कट हेाणार आणि किती जणांना उमेदवारी मिळणार ? अशी चर्चा रंगली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कमालीचा गुंतागुंतीचा झाला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चांवर चर्चा होत असताना कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार याबाबत अजूनही खल सुरूच आहेत. भाजपकडून २३ उमेदवार जाहीर करण्यात आले असले, तरी शिंदे गटाकडून आणि अजित पवार गटाकडून कोणत्याही उमेदवारावर अजून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच मनसेच्या संभाव्य समावेशावर चर्चा सुरू झाली. भाजप आणि शिंदे गटाची प्रत्येकी एक जागा मनसेला देणार असल्याचे समजते. मात्र मनसेच्या समावेशाचा निर्णय अजूनही प्रलंबीत आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदार संघातून सध्या शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तृमाने खासदार आहेत. मात्र काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी  शिंदे गटात प्रवेश केल्याने तुमाने यांचा पत्ता कट हेाणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

शिंदे गटातील किमान ४ खासदारांवर उमेदवारीची टांगती तलवार असल्याचे बोललं जातय. उमेदवारी मिळणार की नाही? अशी धाकधूक त्यांच्यात आहे.  यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघांवर भाजपने दावा केला आहे त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांना तिकिट मिळणार की नाही ? अशी चर्चा सुरू आहे.  कोल्हापुरातून संजय मंडलिक सातत्याने प्रयत्न करत असले, तरी अजूनही कोणताही हिरवा कंदील मिळालेला नाही. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघावरही भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

नाशिकवरून कलगीतुरा रंगला

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या जागेवर सुद्धा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनही भाजपने त्याठिकाणी कडाडून विरोध केला आहे. हेमंत गोडसे यांनी  थेट ठाण्याला धडक देत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दुस-या दिवशी भाजपचे तीन तीन आमदारांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर धडक देत भाजपला उमेदवार देण्याची मागणी केली तर गोडसेंना मदत करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे गोडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार गटातील स्थिती सुद्धा वेगळी नाही. साताराच्या जागेवरून महायुतीमध्ये अजित पवार गट आणि भाजप आमने सामने आले आहेत. याठिकाणी उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीसाठी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकळा असला तरी त्यांच्या उमेदवारीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.  उदयनराजे भाजपच्या चिन्हावर इच्छुक असले, तरी दुसरीकडे अजित पवार उदयनराजे यांना तिकीट देण्यासाठी तयार असले तरी त्यांना घड्याळ चिन्हाची अट ठेवली आहे. त्यामुळे सातारमध्ये कोणता निर्णय घेतला जाणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे.

 शिरूर मतदारसंघांमध्ये अदलाबदल झाली असून मंगळवार २६ मार्चला शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने शिरुरमधील त्यांची उमेदवारी  निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे मावळमध्ये सुद्धा श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत असली, तरी चिन्ह कोणते असेल याबाबत अजूनही मात्र स्पष्टता आलेली नाही. 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याठिकाणी नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची माहिती देण्यात आली असली, तरी मात्र त्याची स्पष्टता आलेली नाही. 
 
 भाजपने २३ जागांवर उमेदवार घोषित करून चित्र स्पष्ट केला असले तरी उर्वरित जागांवरती मात्र अजूनही खल सुरूच आहे. त्यामुळे भाजपकडून शिंदे गट आणि अजित पवार गटाची कोंडी करीत असल्याचेच बोलले जातय.